दुसऱ्या दिवशी म्हणजेच दि.१९ डिसेंबर २०२१ रोजी - रविवारी पहाटे पाच वाजता सर्वजण तयार होऊन बेळगाव कडे आमच्या गाडीनेच निघालो. शिवाजी विद्यापीठाच्या समोर मस्तपैकी चहा घेतला आणि बेळगाव रस्त्याला लागलो.
कोल्हापुरातून बेळगावला जाणाऱ्या रस्त्यावर रहदारी नसल्यामुळे आम्ही वेळेत बेळगाव मध्ये दाखल झाले. मुख्य चिंता होती ती म्हणजे सीमा पार करण्याची. म्हणजेच महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर प्रवासातले कुणीही कोविडने आजारी नाही याबाबतचे कोविड निगेटिव्हचे रिपोर्ट आमच्याकडे होते. याबाबत तपासणी होणार असे ऐकून होतो आणि त्याबाबत आम्ही खबरदारी घेतली होती. परंतु आमच्या चालकाने कोणत्याही प्रकारची टेस्ट केली नसल्यामुळे थोडी चिंता वाटत होती. परंतु देव कृपेने आम्ही यातून पुढे गेलो. पोलिसांनी नाक्यावर काटेकोर तपासणी केली नाही त्यामुळे बेळगावकडे जाणे सुकर झाले.
बेळगावमध्ये दाखल झाल्यावर आमच्या या प्रवासातील पहिल्या मेदूवड्याचा आस्वाद गावातील एका उडपी हॉटेलमध्ये घेतला. जोडीला पायनपल शिरा आणि कॉफी होतीच. नाश्ता झाल्यावर सर्वांनी आपापल्या सायकल गाडीतून बाहेर काढल्या, स्वतःला थंडी, ऊन यापासून संरक्षित करण्याजोगी साधने परिधान केली, नवीन तयार केलेली जर्सी अंगावर चढवली आणि आपल्या आपल्या बाटल्यांमध्ये पाणी भरून, मस्तपैकी फोटो वगैरे काढून आम्ही सर्व आमच्या पहिल्या दिवशीच्या मुक्कामाच्या ठिकाणी म्हणजेच दांडलीकडे सायकल प्रवास सुरू केला.

सुरुवातीचा सगळा रस्ता बेळगाव गावामधूनच होता. सगळीकडे मराठी भाषेतील पाट्यांचे अस्तित्व जाणवत होते. गोमटेश मराठी शाळेच्या मैदानावर संघाची शाखा भरलेली दिसून आली. नुकताच या भागात येळूर जवळ गावाची पाटी मराठी भाषेत लावल्यावरून तणाव निर्माण झाला होता. याच येळूर गावावरून पुढे राजहंसगड या गावावरून पुढे निघालो. वाऱ्याचा वेग चांगला जाणवत होता. काही वेळातच माझी सायकल पंक्चर झाल्याचे जाणवले. ट्रॅव्हलर मधून संजय सरांची दुसरी सायकल घेऊन पुढे प्रवासाला सुरुवात केली. अधून मधून रस्ता खराब होता. संपूर्ण रस्ता सरळ नाही. तसेच बराचसा रस्ता संपूर्ण जंगलातून आहे. बऱ्याच ठिकाणी रस्त्याचं काम असल्यामुळे हवा तसा वेग मिळत नव्हता. प्रत्येक गावामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा हमखास दिसत होता. दोन-तीन ठिकाणी रस्ता चुकण्याचे प्रकार सुद्धा झाले. लांब पल्ल्याच्या प्रवासात अशा गोष्टी घडत असतातच. रामवाडी या गावावरून दांडेली रस्त्याला लागलो. शेवटचा टप्पा सुखावह होता. घाटरस्ता उताराचा होता. दांडेलीच्या अलीकडे गणेशगुडी गावाजवळ परंपरा कॉटेजेस या ठिकाणी आम्हाला पोहोचायचे होते. मी आणि महेश सर थोडी चौकशी करण्यासाठी पुढे गेलो आणि काही वेळातच आमची गाडी आणि इतर सर्वजण परंपरामध्ये दाखल झाले. दुपारचे साडेतीन वाजले होते. आमचे सर्वांचे सरासरी 90 किलोमीटर सायकलिंग झालं होतं. माझं हे आजपर्यंत सर्वात जास्त सायकलिंग अंतर होतं.
या पुढचा दिवस पूर्णपणे विश्रांतीचा होता. संजय सरांनी परंपरा कोटेजमध्ये पूर्ण डॉर्मेट्री बुक केली होती. आमच्या संख्येपेक्षा तिथे जास्त बेड असल्यामुळे आमच्या बॅगांचीही झोपायची स्वतंत्र सोय झाली होती. काही वेळातच आम्ही आवरून खाली जेवायला गेलो. जेवून झाल्यावर सर्वांनी एक छान वामकुक्षी घेतली. संध्याकाळच्या सुमारास गप्पा, चहा, त्यानंतर शेकोटी असा निवांत कार्यक्रम झाला. रात्रीचे जेवणही झकास बनवले होते. उद्या सकाळचा कार्यक्रम निश्चित करून निवास स्थानाकडे वळलो.
समोरच असलेल्या बाल्कनीमध्ये गप्पा झाल्या. सर्वांचे या आधीच्या सायकल सफरींचे अनुभव ऐकत, गाणी ऐकत आजच्या दिवसाची सांगता झाली.
No comments:
Post a Comment