Tuesday, February 18, 2025

सायकल वारी!!!

पंढरपूरची वारी करावं असं खूप दिवसापासून मनात होतं. पूर्ण वारी इतक्यात तरी शक्य वाटत नव्हती परंतु पायी वारीमध्ये एक टप्पा सासवड पर्यंत वगैरे करावा असेही वाटत होतं. पुण्यातील तीन संस्थांनी ( MAA, WoW आणि Pedalwali) एकत्र येऊन पुणे ते पंढरपूर सायकलवारीचे आयोजन केले आहे असा एक मेसेज ग्रुप वर आला होता. मेसेज पाहिल्यानंतर मी आपल्याला बुवा हे शक्य नाही म्हणून लक्ष दिलं नव्हतं परंतु संदीप देशपांडे यांनी मागे लागून आम्हा दोघांचे एका वेळेचे जाण्याचे रजिस्ट्रेशन पूर्ण करून घेतले. रजिस्ट्रेशन तरी केले परंतु म्हणावा तसा सराव होत नव्हता. भावाचं लग्न आणि संघाचा प्रथम वर्षाचा वर्ग यामुळे सरावाला खूप कमी दिवस मिळाले. चार जूनला वर्ग संपला आणि पाच जून पासून सलग चार दिवस तयारी करायची असे मला ठरवले. ठरवल्याप्रमाणे कधीच होत नसते, त्यानुसार चार दिवसांपैकी दोनच दिवस सराव झाला आणि बघता बघता दहा तारीख उजाडली.

म्हणतात ना देव असतो पाठीराखा त्यानुसार तब्येत साथ देत नसतानाही आदल्या दिवशी आत्याचा गोळ्यांचा डोस घेऊन दहा तारखेला सायकल घेऊन पहाटे पावणेतीन वाजता घर सोडलं आणि सारसबागेच्या इथे एकत्र आलो.
ही पंढरीची वारी तीन वेगवेगळ्या संस्थांनी एकत्रित आयोजित केल्यामुळे बऱ्यापैकी तिथे एकमेकांचे ओळखीचे होते.
वारीच्या ग्रुप मध्ये जितेंद्र शहा सरांचे नाव बघून जरा हायसे वाटले. संजय सर (गायकवाड) त्यांच्या बहिणीला आणि आम्हाला सी ऑफ करायला आले होते. साधारण पहाटे पावणे चारच्या सुमारास सारसबाग येथील चमूने हडपसर मार्गे पंढरपूर कडे प्रयाण केले.

भक्ती शक्ती, कोथरूड आणि सारसबाग या तीन ठिकाणाहून एकत्र येऊन हडपसर येथे आमची वारी एकत्रितपणे सुरू होणार होती. परंतु सारसबाग येथील ग्रुप हडपसर येथे वेळेच्या आधी पोहोचला त्यामुळे सर्वांनी पुढे जाण्याचा निर्णय घेतला. सकाळी सात वाजताच नाश्त्याच्या ठिकाणी म्हणजेच चौफुला येथील गुरुदत्त हॉटेलवर येथे पोहोचलो.
आत्तापर्यंत चोपन्न किलोमीटर सायकल चालवून झाली होती. गुरुदत्त हॉटेलवरील जंबो वडापावची चव जिभेवर रेंगाळत ठेऊन कुरकुंब येथे पाण्याच्या स्टॉप ( hydration point) दिशेने निघालो.

टप्प्या टप्प्यावर येणारे पाण्याचे स्टॉप खूप मदत करत होते. पळसदेव-भिगवण येथील टप्पा खूपच कठीण होता. दिसणारे चढ आता जीवघेणे वाटत होते. डोक्यावर सूर्य देवाने आपले हात पसरायला सुरुवात केली होती. इंदापूर फाट्यावरील हॉटेल माऊली प्रसाद येथे सर्वांनी एकत्रित जेवण केले. एकदा सायकलवरून उतरून पुन्हा सायकल वर चढून सायकल चालवणे हा सर्वात त्रासदायक प्रकार होता. मंदार सर, जितेंद्र सर आणि मी जेवणानंतर एकत्र सुरुवात केली आणि काही वेळातच उजनी धरणाच्या आसपास पोहोचलो. येथून टेंभुर्णी आणि टेंभुर्णी वरून पंढरपूर चाळीस किलोमीटर हे डोक्यात ठेवून सर्वांचे सायकलिंग चालू होते. टेंभुर्णीच्या अलीकडे हॉटेल विजय येथे पाण्याचा स्टॉप तसेच सरबत घेऊन पंढरपूरकडे उजवीकडे वळालो. या रस्त्यावर जरी हा राष्ट्रीय महामार्गाचे लिहिलेले असले तरी त्या प्रकारची कोणतीही सोय नव्हती. प्रत्येक किलोमीटरवर दिसणारे मैलाचे दगड आता नकोसे झाले होते. एक पदरी रस्ता, ओव्हरटेक करून समोरून येणाऱ्या भरधाव गाड्या तसेच उलट्या बाजूने येणारे वारे हे सर्वच आमची परीक्षा पाहत होते. वारीचा खरा अनुभव येत होता कारण काही काळाने सायकल पंढरपूर 24 किलोमीटर असताना पंक्चर झाली. डोक्यावर ऊन, आजूबाजूला अजिबात नसलेली झाडे आणि रखरखाट तसेच आम्हाला वैयक्तिक रित्या पंक्चर काढण्यात आलेले अपयश आम्हाला विठ्ठलाची आठवण करून देते होते. त्यानंतर आमच्यासमोर खरा विठ्ठल उभा राहिला. ग्रुप वर मदतीचा मेसेज टाकल्यानंतर काही सेकंदातच मदतीसाठी उलटा फोन आला आणि दहा मिनिटात सपोर्ट ची गाडी आमच्या समोर दाखल झाली. सायकॉलॉजिस्ट या ग्रुपने सपोर्टचे काम अत्यंत उत्तमपणे पार पाडले. सायकलचे पंचर काढून झाल्यानंतर उरलेला प्रवास हा मनाची क्षमता पाहणारा होता. पुढचे 24 किलोमीटर या टप्प्यामध्ये चार पाण्याचे स्टॉप आम्ही घेतले. पाणी बाटलीमध्ये भरून घेतल्यानंतर गार पाणी पाचव्या मिनिटाला पुन्हा उकळल्यासारखे गरम होत होते यावरून उन्हाची तीव्रता लक्षात येईल. सीटवर बसणे सुद्धा कठीण झाले होते. उभे राहून सायकल चालवणे सुसह्य वाटत होते.

पंढरपूरच्या अलीकडे चार किलोमीटरवर तुकाराम बुवा खेडलीकर यांच्या आश्रमामध्ये एक महाकाय विठोबाची मूर्ती दृष्टीस पडली. इथेच विठुरायाला नमस्कार करून पुढचे शेवटचे चार किलोमीटरच्या अंतर पार करण्यास मनोबल देण्याची प्रार्थना करून पुढे निघालो. काही वेळातच गावामध्ये पत्ता विचारत विचारत सुसज्ज अशा विठ्ठल रुक्मिणी भक्त निवासात दाखल झालो. येथे आयोजकांनी राहण्याची उत्तम व्यवस्था केली होती. आम्ही पार्किंग मध्ये सर्व सायकल लावून जेवणासाठी पळालो. रात्री उशिरापर्यंत आमचा सायकल टेम्पोमध्ये चढविण्याचा कार्यक्रम सुरूच होता. रात्री खोलीमध्ये येऊन झोपण्यास बारा वाजले आणि त्यानंतर सुद्धा आयोजकांचे आमची सोय व्यवस्थित होईल यासाठी प्रयत्न सुरू होते. अतिश्रम झाल्यानंतर झोप लवकर लागत नाही असे म्हणतात त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. मध्यरात्री कधी आमचे सहकारी जितेंद्र शहा पंढरपूर पुणे उलट वारीसाठी उठून गेले याचा पत्ताच लागला नाही. सकाळी वेळेत उठून विठ्ठल मंदिराचे कळस दर्शन घेतले.त्यानंतर नाश्ता घेऊन आठ वाजता पुन्हा पुण्याकडे वातानुकूलित अशा "ट्रॅव्हल विथ दामाजी" या गाडीतून निघालो. सोबत अद्वैत होताच. वाटेत पाटील वाडा या छोट्याशा पण सुनियोजित अशा ठिकाणी पुन्हा नाष्टा झाला. आम्हाला आमच्या पुढे मागे आमचे पुन्हा पुण्याला जाणारे सायकल वीर दिसत होते. त्यांना मनोमन नमस्कार केला. ११ तारखेला दुपारी १२.३०च्या सुमारास रेस कोर्स येथील मोकळ्या जागी आमची बस येऊन थांबली. काही वेळातच मी नरवीर तानाजी मालुसरे रस्त्याकडे सायकल घेऊन recovery ride ला सुरुवात केली.

वारीचा अनुभव अजूनही काही संपत नव्हता कारण विठ्ठलवाडी जवळ येतात सायकल पुन्हा एकदा पंक्चर झाली. आपल्या नेहमीच्या बालाजी सायकल वाल्याकडे सायकल पंचर काढून दुपारी तीन वाजता घरी दाखल झालो.

वेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींचा सहवास, प्रत्येकाचे वेगवेगळे अनुभव, बारामती सायकल क्लब यांनी पंढरपूर येथे महाराष्ट्रातील सर्व सायकल प्रेमींचे आयोजित केलेले महासंमेलन तसेच विचित्र वातावरण अनुभवत स्वतःची क्षमता पाहणारा एक सुंदर असा अनुभव घेऊन सर्वजण आपल्या घरी परतले.
माझा संपर्क आयोजकांपैकी मोजक्या लोकांशी आला परंतु सारंग भिडे, आरती चव्हाण, राहुल सर आणि सायकॉलॉजीस्ट सपोर्ट टीम यांचे प्रयत्न माझ्या डोळ्यासमोर दिसून येत होते. तसेच सर्व पाण्याचे स्टॉप इतर वाहनांची व्यवस्था लावणे 
 तसेच जवळजवळ तीनशे च्या आसपास लोकांना सांभाळणे या गोष्टी नक्कीच सोप्या नाहीत. तीन संस्थांनी एकत्र येऊन केलेले प्रयत्न नक्कीच वाखण्याजोगे म्हणता येतील. यापुढे या संस्था यातून चांगला अनुभव घेऊन पुन्हा आम्हाला असेच चांगले अनुभव देत राहतील अशी खात्री वाटते. 

आपलाच 

भटका श्रेयस....

No comments:

Post a Comment